खरीप हंगामातील घेतलेल्या जाणाऱ्या पिकांपैकी सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन साधारणपणे 40 टक्के प्रथिने व 20 टक्के तेलाचे प्रमाण असते. सोयाबीन प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे पीक कडधान्यात तसेच यामध्ये असणाऱ्या तेलामुळे हे पीक गळीताचे पीक म्हणूनही ओळखले जाते. सोयाबीन हे द्विदल पीक असल्याने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देते. सोयाबीन हे ऊस, कापूस, तूर व ज्वारी यामध्ये आंतरपीक म्हणून तसेच फेरपालटीचे पिके व बेवड म्हणून ही महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या झाडाचा पाला-पाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
महाराष्ट्रात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता मात्र कमी आहे. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शेतीचे तुकडीकरण वाढत असून कमी धारण क्षेत्रावर सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. याच उदेशाने शेतकरी बांधवांचे सोयाबीन उत्पादन वाढावे, प्रती हेक्टरी उत्पादकता वाढावी, त्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी सुधारित सोयाबीन लागवड तंत्र हा लेख उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरू शकेल.
हवामान
सोयाबीन हे पीक उष्ण तापमानास अतिशय संवेदनशील आहे. या पिकाची वाढ सरासरी 25 ते 35 अंश तापमान व 700 ते 1000मि.मी. पाऊसमान असलेल्या भागात होऊ शकते. सोयाबीनला आर्द्रता 70 टक्क्यापेक्षा जास्त असल्यास बियांची उगवण क्षमता व रोपांची वाढ चांगली होते. जास्तीत – जास्त फुले येऊन उत्पादन वाढीसाठी साधारणत: 270 ते 300 सेल्सिअस तापमान उत्तम असते.
जमीन
सोयाबीन पिकासाठी जमीन मध्यम स्वरुपाची, भुसभुशीत व पाण्याच्या योग्य निचरा होणारी जमीन उत्तम होते. सोयाबीनच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, लालसर, गाळाची किंवा पोयट्याची जमीन सुद्धा योग्य असते. जमिनीचा सामू (P.H.) साधारणपणे 6.5 ते 7.5 पर्यंत असल्यास, सोयाबीनची वाढ उत्तम होते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल जमीन, मोकळ्या हवेची, अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली, सेंद्रिय पदार्थ मुबलक असलेली जमीन चांगली असते. इतर अन्नघटकांचा साठा समतोल असणे जरुरीचे असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास हे पीक उत्तम येते. अति आम्लधर्मी जमिनीमुळे सोयाबीन मुळांवरील गाठींवर परिणाम होतो. म्हणून शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या जमिनी सोयाबीन लागवडीसाठी शक्यतो टाळाव्यात.
सोयाबीन सुधारित वाण
सोयाबीन वाणांची लागवडीसाठी निवड करताना निवडलेल्या जातीचे दर्जेदार उत्पादन क्षमता असली पाहिजे, कमी कालावधीत पक्व होणारी व काढणीस लवकर येणारी जात, कीड व रोगांना प्रतिकारी करणारी असावी, बाजारपेठेत त्या वाणाला चांगला बाजारभाव व वाणाला गुणात्मक वैशिष्टे असणे आवश्यक आहे. याप्रमाणे विचार करून सोयाबीन लागवडीसाठी त्या जातीचा उपयोग करावा.
1) एम. एस. सी. एस. 13
ही जात मध्यम उंचीची (50सें.मी.) असून तिला मुख्य खोडापासून बऱ्याच फांद्या फुटतात. शेतकऱ्यांच्या शेतावर या जातीचे उत्पन्न प्रति हेक्टरी 25-35 क्विंटल पर्यंत येते. प्रतिकूल हवामानातसुद्धा ही जात चांगले उत्पादन देत असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या राज्यांसाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
2) एम. एस. सी. एस. 124
ही जात 1992 मध्ये विकसित झालेली आहे.या जातीस तयार होण्यास 90-100 दिसाचा कालावधी लागतो, ही जात बऱ्याच रोगांना व किडींना प्रतिकारक आहे. शेंगा न फुटणाऱ्या असून दाणे पिवळसर व आकाराने मोठे आहेत. शेंगात तीन दाण्यांचे प्रमाण 80 टक्केपेक्षा जास्त आहे. ही जात अधिक उत्पन्न देणारी असून प्रति हेक्टरी उत्पादन 30-35 क्विंटलपर्यंत मिळते. या जातीची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
3) जे. एस.- 335
ही जात मध्य भारतात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली आहे. भारतात एकूण सोयाबीन क्षेत्राच्या 90टक्के क्षेत्रावर या जातीची लागवड केली जाते. जे.एस. 78 व 77, जे. एस. 71-05 या जातीच्या संकरापासून ही जात तयार केली आहे. या जातींच्या फुलांचा रंग जांभळा असून, 95ते 100 दिवसांत ही जात परिपक्व होते. या जातीपासून सरासरी उत्पन्न 25-35 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
4) एम. एस. सी. एस. 57
ही जात लवकर येणारी असून साधारणत: 75-90 दिवसांत तयार होते. खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य असून हिरवा मोझॅक विषाणू रोग व करपा रोगास प्रतिकारक आहे. या जातीचे सरासरी 20-30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात कापूस, ऊस व फळबागेत आंतरपीक म्हणून लागवड करण्यास उपयुक्त आहे.
5) एम. एस. सी. एस. 58
ही जात उंच वाढणारी असून फुले निळसर रंगाची व खोड जाड असल्यामुळे झाळे लोळत नसून पीक तयार होण्यास 90-100 दिवसांत परिपक्व होऊन काढणीस येते. या जातीची उगवण क्षमता 90 टक्के पेक्षा अधिक असून बहुसंख्य रोग व किडींना प्रतिकारक आहे. या जातीचे सरासरी उत्पादन 25-35 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. यात तेलाचे प्रमाण जास्त असते. या जातीची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या राज्यांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
पूर्व मशागत
सोयाबीन लागवडीपूर्वी शेताची ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून जमिनीतील निघालेले धसकटे, काडीकचरा वगैरे वेचून जमीन स्वच्छ ठेवावी. नांगरणी नंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून समपातळीत करून घ्यावी, त्यानंतर जमिनीत चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट खत (सुमारे 12 ते 17 गाड्या) मिसळून जमीन तयार करावी.
पेरणी हंगाम
सोयाबीन लागवडीचे प्रमुख दोन हंगाम असून खरीप व उन्हाळी असे आहेत. खरीप पेरणी जून महिन्यात 75 ते 100 सें.मी. पाऊस झाल्यावर जमिनीत 4 सें.मी. खोलीवर पेरणी करावी. सोयाबीन बियाणे 4सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरल्यास बियाणे कुजून जाते किंवा अंकुर वाळतो, त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. पेरणीचा योग्य कालावधी हा जूनचा तिसरा आठवडा (20 जून) ते जूलैचा दुसरा आठवडा (10 जूलै) आहे. 15जूलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. शक्यतो 20जूलैनंतर सोयाबीनची पेरणी करू नये.
बीजप्रक्रिया
सोयाबीन पिकाचे मुळकुजव्या व इतर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करावयाचे असल्यास 3 ग्रॅम थायरम 1 किलो बियाण्यास किंवा 2 ग्रॅम थायरम + 1 ग्रॅम बावीस्टीन किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी (जैविक) बुरशी) प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर सोयाबीन पिकासाठी रायझोबियम जपोनिकम हे जिवाणू खत वापरावे. साधारणत: 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू खत अधिक 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू खत 10 ते 15 किलो बियाण्यासाठी वापरावेत. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे सोयाबीन मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
हेक्टरी बियाणे (किलो)
सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी 4 ते 4.5 लाख झाडांची संख्या शेतात राखण्यासाठी 70-75 टक्के उगवण क्षमता असलेले 75किलो बियाणे प्रमाणे हेक्टरी वापरावे किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे 80 किलो पुरेसे होते. अन्यथा उत्पादन कमी मिळते.
सोयाबीन पेरणी पद्धती
अ) पारंपारिक पेरणी
सर्व खरीप पिकांची पेरणी शक्यतो पूर्व-पश्चिम अशी करतात. सोयाबीन सुद्धा याला अपवाद नाही. परंतु शेताला जर उतार असेल तर मशागतीसोबतच पेरणी सुद्धा उताराला आडवी राहील याची दक्षता घेऊनच करावी. पेरणी करतांना तिफणीने किंवा पेरणी पाभरीने करावी, तिफणीचा वापर टाळावा. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम दिशेने करावी. सोयाबीन करिता दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर 30 x 10 सें. मी. किंवा 45 x 10 सें. मी. ठेवावे. सोयाबीन बियाची पेरणी 4सें.मी. खोलीवर करावी. पेरणी करतांना बी जमिनीत जास्त खोलवर जाऊ नये याची दक्षता घ्यावी.
ब) आधुनिक ट्रॅक्टरद्वारे पेरणी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांनी विकसित केलेले हे पेरणी यंत्र ट्रॅक्टरचलित असून या यंत्राने सोयाबीन पिकांची पेरणी चांगल्या प्रकारे करता येते. सदरचे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र हे बैचलित पेरणी यंत्राप्रमाणे आहे. फक्त यामध्ये बियाणे व खतांच्या पेटीचा आकार वाढविलेला आहे. या यंत्रामध्ये बियाणे नियंत्रित करण्यासाठी प्लॅस्टिक रोटर वापरले आहेत. खत नियंत्रणासाठी फ्युटेरोलरची सोय आहे. यामध्ये फणांतील अंतर कमी – जास्त करता येते. या यंत्राणे सहा ते नऊ ओळी एका वेळेस पेरता येतात. या यंत्राने 8 ते 10 एकर क्षेत्र एक दिवस पेरणी करता येते. ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यास मनुष्याची गरज भासत नाही. कमी वेळात व कमी श्रमात जास्त क्षेत्र पेरणी करता येणे सुलभ झाले आहे. ज्या ठिकाणी शेतमजूरांचा अभाव आहे अशा ठिकाणी या पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते.
आंतरमशागत
खरीप हंगामातील पिकांना आंतरमशागत करणे अत्यंत गरजेचे असते. मुख्य पिकाच्या दोन ओळी मध्ये केल्या जाणाऱ्या उदा. खुरपणी करणे, कोळपणी, करणे, विरळणी करणे, इत्यादी कामास आंतरमशागत असे म्हणतात. पिकाच्या जोमदार योग्य वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवावे. सोयाबीन पीक 25 ते 30 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. तसेच सोयाबीन पिकांतील तणे खुरपणीद्वारे काढून शेत तणविरहित ठेवावे. तणांचा प्रादुर्भाव अधिक असल्यास सोयाबीन पिकांत तणनाशक फवारणी करावयाचे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पाणी व्यवस्थापन
सोयाबीन हे आपल्याकडे खरीप हंगामात घेतले जात असल्याने त्याला फारशे पाणी देण्याची गरज भासत नाही. परंतु पाऊसाचा खंड पडल्यास किंवा पीक फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना एक ते दोन संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे. अथवा यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यास पारंपारिक पद्धतीने पाणी देणे गरजेचे असते.
सोयाबीन आंतरपिके
सोयाबीन पीक कमी कालावधीचे (90 दिवस) असल्यामुळे जास्त करून यात आंतरपिकांचा समावेश कमी प्रमाणात होतो, तर ऊस, तूर, ज्वारी यामध्ये आंतरपीक म्हणून जास्त प्रमाणात घेतले होते. उदा. कपाशी + सोयाबीन 1.2 किंवा 1.1 ओळीच्या प्रमाणात किंवा तूर + सोयाबीन 1.2 किंवा 2.4 ओळीच्या प्रमाणात लागवड करणे गरजेचे असते.
तक्ता क्र. 1 : सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी खतांचा मात्रा
लागवडीनंतर दिवस | नत्र | स्फुरद | पालाश | मॅग्नेशियम सल्फेट | कॅल्शियम नायट्रेट | झिंक सल्फेट | फेरस सल्फेट |
5 ते 10 दिवस | 20 | 75 | 75 | 00 | 00 | 00 | 10 |
30 ते 35 | 00 | 00 | 00 | 10 | 00 | 00 | 10 |
एकूण | 20 | 75 | 75 | 10 | 00 | 00 | 10 |
सोयाबीन प्रमुख किडींचे व्यवस्थापन
सोयाबीनवर प्रामुख्याने पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, घाटेअळी, हिरवी उंट-अळी, खोडमाशी, लष्करी अळी, केसाळ अळी, पानावरील ठिपके, पानांवरील मोझॅक, मावा, तुडतुडे, फुलकिडे इ. अनेक किडी अधिक प्रमाणात आढळून येतात.
1) पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिटुरा)
पाने पोखरणारी अळ्या ह्या तीन प्रकारच्या असतात. आपणाकडे या अळ्यांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात असतो. अळ्या पानावरील पापुद्रा तसाच ठेऊन पानातील हरित पदार्थ खातात. ह्या अळ्या पानावर नागमोडी चरत जातात. त्यामुळे पानांवर पांढ-या रेषा व चट्टे दिसतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने वाळतात व पडतात.
उपाय : महाराष्ट्रात सोयाबीनच्या पिकावर या किडींचा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव होत असला तरी, काही ठिकाणी यांचा उपद्रव जास्त असतो. यासाठी इन्डोकार्ब 6.6 मि. ली. किंवा क्लोरएंट्रानिलोप्रोल 18.5 ईसी 2 ते 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.
2) पाने गुंडाळणाऱ्या अळ्या
खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकामध्ये अळ्या अतिशय नुकसानकारक ठरतात. या किडींच्या पतंगाला पांढऱ्या रंगाचे पंख असतात. पुढील पंखावर पांढ पांढऱ्या या रंगाचा फिक्ट ठिपका असतो. अळी तपकिरी करड्या रंगाची असून पाठीमागे निमुळती असते. फक्त अळी पिकाचे नुकसान करते. प्रथम अळी पानांचा वरचा पापुद्रा पोखरते. मोठी झाल्यावर पानांची गुंडाळी करून त्यामध्ये राहते. पानांचा रस शोषण करते व पानांवर उपजीविका करते. त्यामुळे पाने करपून आकसतात व वाळून जातात. या किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पीक करपल्यासारखे दिसते, म्हणजेच ही अळी प्रकाशसंश्लेषण क्रियेस अडथळा आणते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट योग्य करावी. एक हेक्टर सोयाबीनच्या क्षेत्रासाठी एका प्रकाश सापळयाचा वापर फायदेशीर ठरतो. नियंत्रणासाठी डेकामेथ्रीन 8 मि.ली. 10 ली. पाण्यात, सायपरमोथ्रिन 25 % प्रवाही 50 मि. लि. 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
3) फुलकिडे
सोयाबीन पिकाच्या फुलोऱ्या अवस्थांमध्ये ह्या किडीचे अस्तित्व स्पष्ट दिसू लागते. पाऊसमान तसेच जास्त तापमान अशी हवामानाची स्थिती निर्माण झाली की पिकास फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलकिड्यांच्या तीन जाती आहेत. त्यांचा रंग फिक्कट पिवळसर असते. ते पाने खातात व आतील रसाचे शोषण करतात. या उपद्रवामुळे पाने चुरडू लागतात. फुलकिड्यांना अरूंद अशा पंखांच्या दोन जोड्या असतात. भिंगातून पंखाचे निरीक्षण केल्यास ते दोन्ही बाजूस दाते असलेल्या कंगव्याप्रमाणे असतात. या किडीचा प्रादुर्भाव दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असतो. फुलकिड्यांची मादी पानांच्या शिरांमधील पेशीत अंडी घालते. एक मादी साधारणता 4 ते 6 दिवसांच्या काळात 50 ते 60 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडताच पिल्ले पूर्ण वाढ होईपर्यंत पानांतील व कळ्यांमधील रसांचे शोषण करतात. फुलकिड्यांचा आयुष्यक्रम साधारणतः 25 दिवसांचा असतो.
उपाय : फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 50